तो आला...
- Harshali
- Aug 14, 2020
- 2 min read
Updated: Aug 23, 2020
जून चा महिना सुरु झालेला. तरीही कडक उन्हाळा. दुपारचं जेवण झालेलं. लाईट गेलेली असल्याने भयंकर उकडत होतं. डोळ्यावर झोप येत होती. ब्रम्हानंदी टाळी लागणारच होती पण घामाच्या धारा त्यात, दुधात मिठाचा खडा टाकावा, तसा व्यत्यय आणत होत्या. शेवटी वैतागून उठलेच आणि बाल्कनी मध्ये असलेल्या खुर्चीवर निवांत बसले. बाहेर ऊन इतकं प्रखर होतं कि डोळे बारीक न करता बघणं केवळ अशक्य होतं. रस्त्यावरचं डांबर केवळ उन्हानेच आता वितळतंय कि काय असं वाटायला लागलं. समोरचा गुलमोहर मात्र आपली लाल फूल घेऊन दिमाखात उभा होता. दुरून कुठून तरी बर्फाचा गोळा/ कुल्फी विकणाऱ्याचा आवाज येत होता. उन्हाच्या गरम झळा झेलण्यात काही अर्थ वाटत न्हवता म्हणून आत जावं या विचाराने मी आत वळले खरी पण तेवढ्यात सुसाट्याचा वारा सुटला,रस्त्यावरची शांत झोप घेत असलेली धूळ लगबगीने उठून वाऱ्यासोबत जणू फेर धरू लागली, दिमाखात उभा असलेला गुलमोहर हि आता कावराबावरा झाला होता अन इतक्यात तो आला..
तो नेहमीच अशा थाटात येतो. सगळ्यांची धांदल उडते हे खरं असलं तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम हि तोच करत असतो. तो नेहमीच सगळ्यांना जिंकण्याच्या इर्षेने येतो. यावेळेस हि तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं! तुम्ही ओळखलं असेलंच, तो म्हणजे 'पाऊस'! सारी सृष्टी त्याच्या स्वागतासाठी सज्ज होते. रस्ते आपली धूळ झटकून आनंदाने न्हाऊन निघतात. झाडाला नवा बहार येतो. प्राणी, पक्षी आणि आपण सगळेच त्याच्या येण्याने असून जातो. हा, तो कधी कधी इतका उशीर करतो कि डोळ्यात पाणी देखील आणतो. तेव्हा खूप राग येतो त्याचा. शेतकऱ्यांच्या तोंडून शावेळी तो शिव्या शाप हि खातो, पण मग हसत हसत त्यांच्यावर आपल्या काळ्या मेघातून आनंदाची बरसात करतो आणि शिव्या शाप देणारे शेतकरी त्याच्यावर तितक्याच प्रेमाने आभार आणि आशीर्वादाची बरसात करतात.
का कुणास ठाऊक पण तशा तो मला थकलेला, चिडलेला वाटतो. म्हणूनच कि काय कधी कधी रागात इतका बरसतो कि ज्यांच्यावर तो प्रेम करतो त्या आपल्या सगळ्यांचा संसार पाण्याखाली जाण्यास कारणीभूत ठरतो. मग मी मात्र विचारात पडते कि चूक कोणाची, आपली कि त्याची? तो लवकर येत नाही, आला कि सोबत महापूर आणतो. पण असं का? त्याच्यावर आपण अवलंबून असल्याने हा सगळं विध्वंस पहिला कि आपली चिडचिड होणारच, पण तसाच ज्याच्यावर तो अवलंबून आहे किंवा ज्याच्यामुळे तो आहे त्या निसर्गालाच जर आपण हानी पोहचवत असलो तर त्याला हि राग येणारच. महापूर, दुष्काळ पहिला, त्यामध्ये नुकसान झालेली लोकं पाहिली कि डोळे आपोआप ओलावतात. जसं या सगळ्यामागे आपण निसर्गाला जबाबदार धरतो तसंच यात आपलीही चूक आहे हे हि काही अंशी आता आपल्या लक्षात यायला लागलंय. मी काही निसर्ग वाचवा, झाडे लावा असा संदेश अजिबात द्यायला आलेली नाहीये कारण यासाठी काय काय करायला हवं हे मला वाटतं सगळ्यांनाच माहितीये.
आणि खरं सांगू का, बाहेर रिमझिमणारा पाऊस, सोबत गरमागरम चहा आणि कांदाभजी, रेडिओवर मस्त किशोर कुमार किंवा मंगेश पाडगावकरांच्या कविता आणि सोबतीला जन्माचा जोडीदार, सुखाची व्याख्या यापेक्षा काही वेगळी असेल असं मला वाटत नाही.
"पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला
झाडे झाली हिरवी गाणी
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला"
पाऊसाची चाहुल लागण्या आगोदर केलेली सुरुवात खरच खूप सुंदर आहे.आपण वापरलेले आलंकारीक शब्द, निसर्गाच्या भावना ,मंगेश पाडगावकरांच्या कवितांची आठवण या सगळ्यामुळे आपला लेख खूपच मनाला भावला.
आपल्या पुढच्या लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !💐
Wow... My favorite topic and well written...😍